06/06/2026
आज (६ जून) छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक दिन...
३५२ वर्षांपूर्वीचा ६ जून हा दिवस तत्कालीन भारताच्या इतिहासातील सुवर्णदिनच... कारण ६ जून १६७४ रोजी असंख्य हिंदूंचे, शहाजीराजे-जिजामाता यांचे आणि तमाम रयतेने अनेक वर्षांपासून उराशी बाळगलेले स्वप्न साकार झाले. मोगली पातशाह्यांना कडवी टक्कर देत हिंदवी स्वराज्य प्रत्यक्षात अस्तित्वात आले. दुर्गराज रायगडावर वेदमंत्रांच्या घोषात, सप्तनद्यांच्या जलाभिषेकात, देवी श्री तुळजाभवानीच्या कृपावर्षावात आणि माता जिजाऊंच्या आशीर्वादाने पुनित होत शिवाजी महाराज ‘छत्रपती’ बनले.
पातशाह्यांच्या जुलमाखाली भरडून निघणाऱ्या रयतेला छ. शिवाजी महाराजांच्या रूपाने ‘तारणहार’ मिळाला. दुर्दम्य आत्मविश्वास, जिद्द, शौर्य आणि विश्वासू सवंगडी, स्वामिनिष्ठ मावळ्यांच्या बळावर शिवाजी महाराजांनी 'हिंदवी स्वराज्य' निर्माण केले. म्हणूनच भारतीय इतिहासातील ही युगप्रवर्तक घटना मानली जाते.
शिवरायांच्या जन्माअगोदर अनेक राज्ये, राजे अस्तित्वात आले अन् लयास गेले. मात्र, हे आपले राज्य आहे, अशी सर्वसामान्य रयतेमध्ये भावना निर्माण करणारे राजे म्हणजे शिवाजी महाराज होत. म्हणून शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा तो दिवस, तो क्षण, तो सोहळा अत्यंत पवित्र, अमृतमयी आणि अभूतपूर्व... ज्यांनी तो अनुभवला त्यांचे ते परमभाग्यच..!
युगपुरुष, छ. शिवाजी महाराजांना ‘राज्याभिषेक दिना’निमित्त मानाचा मुजरा...
जय भवानी... जय शिवाजी...
#छत्रपती_शिवाजी_महाराज #हिंदवी_स्वराज्य #राज्याभिषेक_दिन #रायगड #मुजरा