19/06/2022
अभियांत्रिकी पदविका अर्थात पॉलीटेक्निक -दहावी नंतर करियरची उत्तम संधी
दहावीचा निकाल जाहीर झाला असून दहावीनंतर इंजिनिअरिंग डिप्लोमा अर्थात पॉलिटेक्निक प्रवेशासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे आणि त्यासाठी सीईटी परीक्षा देण्याची आवश्यकता नाही. ज्या विद्यार्थ्यांना इंजीनियरिंग करावयाचे आहे त्यांना दहावीनंतर अकरावी बारावी सायन्स किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा अर्थात पॉलिटेक्निक असे दोन पर्याय असतात. दोन्ही मार्गांनी दहावीनंतर सहा वर्षात इंजिनिअरिंग पदवी शिक्षण पूर्ण करता येते. म्हणूनच यातील कोणता योग्य पर्याय निवडावा याविषयी विद्यार्थी व पालकांमध्ये संभ्रम अथवा कुतूहल असते.
दहावीनंतर इंजिनिअरिंग डिप्लोमा अर्थात पॉलिटेक्निक करण्याचे खालील फायदे विद्यार्थी व पालकांनी समजून घेतल्यास योग्य निर्णय घेणे सोपे जाईल.
इंजिनीरिंग डिप्लोमाचे (पॉलिटेक्निक) फायदे :
1) अकरावी बारावी सायन्सचा अभ्यास, सीईटी क्लासेस, भरमसाठ फी व स्पर्धा या सगळ्यातून सुटका होऊन डिप्लोमा नंतर थेट इंजीनियरिंग डिग्री च्या दुसऱ्या वर्षात प्रवेश मिळतो. म्हणजे पॉलीटेक्निक प्रवेशासाठी व इंजीनियरिंग डिग्री (थेट द्वितीय वर्ष) प्रवेशासाठी कोणतीही सीईटी परीक्षा देण्याची अजिबात आवश्यकता नाही. तसेच पॉलिटेक्निकचे शिक्षण हे तुलनेने खूपच कमी खर्चात पूर्ण करता येते आणि शासकीय तंत्रनिकेतनातून केल्यास अत्यल्प खर्चात पूर्ण करता येते त्यामुळे विशेषत: सामान्य व मध्यमवर्गीय कुटुंबातील विद्यार्थ्यांना पॉलिटेक्निक शिक्षण ही एक पर्वणीच आहे असे म्हणता येईल.
2) दहावीपर्यंत संपूर्ण मराठी माध्यमातून शिकलेल्या मुलांना तंत्रशिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबई व महाराष्ट्र तंत्रशिक्षण मंडळ मुंबई यांच्या निर्णयामुळे यावर्षीपासून प्रथम वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षेतील प्रश्नांची उत्तरे ही मातृभाषेतून अर्थात मराठीतून लिहिण्याची परवानगी असणार आहे. तांत्रिक व व्यावसायिक शिक्षण मातृभाषेत असावे हे शासनाचे धोरण असल्याने ग्रामीण भागातील असंख्य विद्यार्थ्यांना ज्या इंग्रजी भाषेची भीती असायची ती कमी होण्यास मदत होईल. तसेच त्यांची इंग्रजी भाषा सुधारण्यासाठी वेगळे विशेष प्रयत्न केले जातील.
इंग्रजी भाषेपासून सुटका व मातृभाषेत मराठी मध्ये प्रथम वर्षाचे शिक्षण यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढून त्यांचा इंग्रजी बद्दलचा असणारा न्यूनगंडही कमी होण्यास मदत होईल
3) पॉलिटेक्निक डिप्लोमा हे व्यावसायिक शिक्षण असल्याने डिप्लोमा नंतर विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात नोकरी, व्यवसाय, स्टार्टअप च्या संधी उपलब्ध आहेत. सार्वजनिक बांधकाम विभाग, पाटबंधारे, रेल्वे, संरक्षण दले, आरटीओ, महावितरण, एमआयडीसी इत्यादि शासकीय, निमशासकीय कार्यालये व उद्योगांबरोबरच खाजगी क्षेत्रातही नोकरीच्या संधी डिप्लोमा नंतर उपलब्ध आहेत. तसेच अनेक खाजगी व्यवसाय, उद्योगांची उभारणी करता येते व त्याकरिता बँकांचे, सरकारी योजनांचे आर्थिक पाठबळ मिळते. तसेच विविध शासकीय कामांची कंत्राटदार नोंदणी व तदनुषंगिक कामे प्राधान्याने दिली जातात.
4) पॉलिटेक्निक डिप्लोमा पूर्ण झाल्यानंतर पुढील अभियांत्रिकी डिग्री शिक्षणासाठी भक्कम पाया तयार होतो व बहुतांश हेच विद्यार्थी अधिक गुणवत्तेने यश मिळवतात.
5) पॉलिटेक्निक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना खालील शिष्यवृत्ती योजना उत्पन्न मर्यादेच्या अधीन राहून लागू आहेत
अ) भारत सरकारची दहावीनंतर शिष्यवृत्ती योजना (अनुसूचित जाती व नवबौद्ध यांच्यासाठी)
ब) व्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी देखभाल भत्ता (भारत सरकार शिष्यवृत्ती पात्र असणाऱ्यांसाठी)
क) राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना (आर्थिक दृष्ट्या मागास प्रवर्ग)
ड) डॉ.पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना (अल्पभूधारक शेतकरी किंवा नोंदणीकृत मजूर यांचे करिता)
इ) अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती (मुस्लिम, बौद्ध, ख्रिश्चन, शीख, पारशी, जैन समाजातील गुणवंत विद्यार्थी)
6) पॉलिटेक्निक डिप्लोमा शिक्षण हे साधारणतः एकोणिसाव्या वर्षी पूर्ण होत असल्याने हे विद्यार्थी वयाच्या अवघ्या १९ व्या वर्षी रोजगाराभिमुख बनतात त्यामुळे समाजातील आर्थिक दृष्ट्या कमकुवत कुटुंबाकरिता निश्चितच हा आशेचा किरण ठरतो.
एकंदरीत समाज व राष्ट्राच्या आर्थिक उन्नतीकरिता पॉलिटेक्निक डिप्लोमा अभ्यासक्रम अत्यंत चांगला असून आपल्या देशाचे सकल राष्ट्रीय उत्पन्न अर्थात जीडीपीमध्ये वाढ होण्यास अत्यंत उपयुक्त आहे. पॉलिटेक्निक डिप्लोमा या शिक्षणानंतर बाहेर पडणारा अभियंता हा विशिष्ट क्षेत्रातील तांत्रिक कौशल्य आत्मसात करून कृषी, उद्योग, बांधकाम व सेवा इत्यादी आघाड्यांवर यशस्वी होऊ शकतो व देशाच्या आर्थिक विकासाचा दर उंचावण्यास हातभार लावू शकतो हे नक्की.
प्रवेश अर्ज भरण्यासाठी www.dtemaharastra.gov.in या वेबसाईटला भेट द्या.
प्रवेश प्रक्रियेसंदर्भात मोफत मार्गदर्शन, समुपदेशन व प्रवेश अर्ज भरण्यासाठी शासकीय तंत्रनिकेतन, बाबनगर, नांदेड या संस्थेस भेट द्यावी.
संपर्क: प्रा. मुधोळकर 9422172891
प्रा. ए. एन. यादव 8855888905
डॉ.गोरक्ष गर्जे
प्राचार्य
शासकीय तंत्रनिकेतन नांदेड